अभय पाठक प्रॉडक्शनच्या नव्या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न
प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्याच्या हेतूने निर्माता - दिग्दर्शकांची नवी पिढी मराठी चित्रपटात नवनवे बदल करू पाहतेय. तरुणाईच्या पसंतीस उतरेल असा कथा विषय, संगीत असलेले चित्रपट अलीकडच्या काळात प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरलेत. हेच लक्षात घेत 'अभय पाठक प्रॉडक्शन' निर्मिती संस्था आपला आगामी मराठी चित्रपट घेऊन येत आहे. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या '२०१४ राजकारण' या मराठी चित्रपटाची निर्मिती करीत त्यांनी सिनेसृष्टीत यशस्वी पदार्पण केले, त्यानंतर येऊ घातलेला त्यांचा हा दुसरा चित्रपट असून पुण्यात नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त 'व्हिडीओ पॅलेस'चे नानूभाई जयसिंघानीया यांच्या हस्ते करण्यात आला. मैत्री आणि प्रेमाची नवी परिभाषा उलगडणाऱ्या या चित्रपटाचे शीर्षक अद्याप निश्चित व्हायचे आहे.
अभय पाठक निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश पावसकर करीत आहेत. पहिल्या सिनेमात राजकारणासारखा विषय निवडलेल्या अभय पाठक यांनी यावेळी तरुणाईसाठी अनोखी प्रेमकथा आणली आहे. विशेष म्हणजे आपल्या अभिनयाने अल्पावधीत लोकप्रिय ठरलेला अभिनेता प्रथमेश परब एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. चित्रपटात अशोक समर्थ, मोहन जोशी, नितीन जाधव या कलाकारांच्या ही भूमिका आहेत. चित्रपटाची सह निर्मिती गौरी पाठक यांनी केली आहे.
चित्रपटाची कथा सागर पाठक यांनी लिहिली असून पटकथा-संवाद वैभव चिंचाळकर यांनी लिहिले आहेत. चित्रपटातील गीतांसाठी समीर साप्तीस्कर, आरिफ, अरॉन हे युवा संगीतकार आजच्या पिढीला ठेका धरायला लावणारं संगीत दिग्दर्शन करीत आहेत. भूषण वाणी चित्रपटाचे छायांकन करीत असून कला दिग्दर्शन - अरुण रहाणे, रंगभूषा - ललित कुलकर्णी, वेशभूषा - मोहिनी ननावरे, ध्वनी संयोजन - उमर मुलानी अशी इतर श्रेयनामावली आहे. सप्टेंबर अखेरीस चित्रीकरणास सुरुवात होईल.
No comments:
Post a Comment