Saturday, March 23, 2019

भाडिपाच्या लोकमंचावर आदित्य ठाकरेंची चौफेर फटकेबाजी




काही पक्षांसाठी निवडणुका महत्त्वाच्या असतील, पण आमच्यासाठी लोकांची कामं महत्त्वाची आहेत. निवडणुकीत हार-जीत होत असते, पण जनहिताची कामे जास्त आनंद देतात, त्या कामातून मिळणारे समाधान महत्त्वाचे, असं सांगत समाजकारण आणि राजकारण यांची उत्तम सांगड घालत शहर विकसित करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी केले. लोकमंच या उपक्रमांतर्गत भाडिपाच्या विषय खोल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जनतेशी थेट संवाद त्यांनी साधला.
राजकीय ते वैयक्तिक प्रवासाबाबत विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांवर चौफेर फटकेबाजी करत निवडणुका, शिक्षण,पर्यावरण, कायदा, तसेच पक्षाची भूमिका यासारख्या अनेक मुद्द्यांबाबतचा आपला दृष्टीकोन आदित्य यांनी यावेळी उलगडून दाखवला. रुळलेल्या शिक्षणपद्धतीपेक्षा रिसर्चयुक्त शिक्षणाची गरज त्यांनी यावेळी बोलून दाखविली. इंटरनेट, केबल, वायफाय कनेक्टिव्हिटी यासोबतच चांगली शहर कशी निर्माण होतील हे पाहणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी याप्रसंगी  सांगितले. कलाकृती विरोधात होणाऱ्या स्थानिक सेन्सॉरशिपबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना शिवसेनेने नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली असून यापुढे सुद्धा हीच भूमिका असेल असं सांगत तुम्ही तुमच्या अडचणी आम्हाला सांगा, त्या सोडवण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
राजकारण म्हणजे केवळ निवडणूक नाही तर राजकारणातून समाजकारण करणे महत्त्वाचे असं सांगत प्रत्येकाने यासाठी आवर्जून मतदान करावे असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. वेगवेगळ्या माध्यमातून विकासाचे अनेक पर्याय उपलब्ध होत असताना व ते करून देत असताना त्यात समतोल राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न होणं गरजेचं असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केले. संवादक सविता प्रभुणे यांच्यासोबत रंगलेल्या या औपचारिक गप्पा उत्तरोत्तर चांगल्याच रंगल्या.

No comments:

Post a Comment