Saturday, April 5, 2014

निवडणूकीच्या रिंगणात 'आता होऊ दया खर्च' चा सूर

निवडणूकीच्या रिंगणात 'आता होऊ दया खर्च' चा सूर 




            निवडणुकीचे वारे जोरदार वाह्तायेत. जिंकण्याच्या इर्षेने प्रत्येक जण आश्वासनांची बरसात करताहेत.  याच पाश्वभूमीवर 'आता होऊ दया खर्च' असं म्हणत गायिका रेश्मा सोनावणे नेत्यांना त्यांच्या कामाची आठवण करून देणार आहे. आगामी 'पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा' या सिनेमातून गायिका रेश्मा सोनावणेने 'आता होऊ दया खर्च' हे ठसकेदार गाणं गायलं आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या वर्मावर बोट ठेवणारं हे ठसकेदार गाणं अरविंद जगताप यांनी लिहिलं असून शशांक पोवार यांनी या गाण्याला अप्रतिम संगीत दिलं आहे. या गाण्यातून नेत्यांची कानउघडणी गमतीशीरपणे करण्यात आली आहे.

            नुकतंच या गाण्याचं गीतध्वनीमुद्रण संपन्न झालं. रेकॉर्डींगच्या वेळी या चित्रपटातील कलाकार सयाजी शिंदे स्वतः आवर्जून उपस्थित होते, शिवाय गाण्यातील प्रत्येक बारकाव्याकडे ते जातीने लक्ष देत होते.  'रिक्षावाला', 'साजूक तुपातील' या गाण्यांच्या यशानंतर रेश्मा सोनावणे आपल्या या गाण्याबद्दलही तितकीच उत्सुक आहे. सयाजी शिंदे यांनी रेश्माच्या गाण्याला दिलेली दाद ही तिच्यासाठी अमुल्य असल्याची भावना तिने यावेळी व्यक्त केली. 'सिद्धिविनायक इंटरनॅशनल फिल्म्स' निर्मिती संस्थेचे निर्माते नविन सिंग आणि राकेश भोसले यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची तर दिग्दर्शनाची धुरा बाळकृष्ण शिंदे यांनी सांभाळली आहे. 

           'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' या गाजलेल्या चित्रपटाचा सिक्वेल निवडणुकीच्या रणधुमाळीत धुमाकूळ घालायला सज्ज झाला आहे. 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा'च्या यशानंतर या चित्रपटाचा सिक्वेल करताना जबाबदारी आणखीन वाढल्याची भावना निर्मात्यांनी व्यक्त केली. नारायण वाघ आणि विश्वासराव टोपे या नेत्यांच्या पारंपारिक राजकीय शत्रुत्वाची कथा 'पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा' या चित्रपटातून रंगणार आहे. सध्याच्या राजकारणाचं खुमासदार चित्रण आगामी 'पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा' द्वारे प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

No comments:

Post a Comment