प्रेम जगातली सगळ्यात सुंदर भावना. ती शब्दात व्यक्त करणं अवघडच ! प्रेम हे प्रेम असतं ते कोणी आणि कोणावर केलं यावर ते चूक की बरोबर हे नाही ठरवता येत. आयुष्यात कोणत्या ना कोणत्या वळणावर आपण प्रेमात पडतोच. प्रेम कधी रिमझिम बरसणार तर कधी आवेगाने झेपावणार.. अगदी पावसासारखं. प्रेमाची हीच गमंत मेघना मनोज काकुलो निर्मित, गिरीश मोहिते दिग्दर्शित गुरु पौर्णिमा चित्रपटाच्या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. येत्या सप्टेंबर मध्ये प्रदर्शित होणाऱ्या 'गुरु पौर्णिमा' सिनेमाच्या रोमॅंटिक संगीताचे प्रकाशन नुकतेच मोठ्या दिमाखात संपन्न झाले. या प्रसंगी मा. श्री. एकनाथ शिंदे, सुप्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते सचिन पिळगांवकर, व्हीडीओ पॅलेसचे नानूभाई जयसिंघानी, चित्रपटातील कलाकार - तंत्रज्ञासह सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी लाईव्ह पर्फ़ोर्मन्सच्या जोडीने रंगलेला चित्रपटातील सुरेल गीतांचा म्युझिकल शो उपस्थितांची मन जिंकणारा ठरला.
'श्रीहित प्रॉडक्शन' च्या 'गुरु पौर्णिमा' चित्रपटात 'लव्हेबल' प्रेमाची गोष्ट चित्रित करण्यात आली असून उपेंद्र लिमये आणि सई ताम्हणकर यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांना अनोखी ट्रीट ठरणार आहे. चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी परेश नाईक सांभाळीत आहेत. लवस्टोरीवर आधारित सिनेमा असल्याने याचे संगीत तरुणाईला ताल धरायला लावणारं असून वैभव जोशी, अनुराधा राजाध्यक्ष, विश्वजीत, सत्यजीत रानडे लिखित यातील गीतांना युवा संगीतकार अविनाश- विश्वजीत या जोडीने संगीत दिलंय. राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या गायिका बेला शेंडे व गायक स्वप्नील बांदोडकर, स्वरूप भालवणकर, संदीप उबाळे, नेहा राजपाल, श्रावणी रविंद्र यांच्या सुरेल आवाजात ही गीते स्वरबद्ध झाली आहेत.
'ऐकावी वाटते', 'कल्ला मस्ती ऑन द वे', 'विसरुनी क्षण' अशा शब्दरचना असणारी ही गीते प्रेम आणि प्रेमातील भावछटा रेखाटत मनाला भिडतील अशी आहेत. यातील ऐकावी वाटते हे गीत व्हेरिएशनमुळे अधिक श्रवणीय झाले आहे. बेला शेंडेच्या आवाजात, स्वप्निल बांदोडकरच्या आवाजात आणि एकदा दोघांच्याही आवाजात अशा तीन वेळा त्याचा आस्वाद घेता येणार आहे. 'विसरुनी क्षण' हे गीत मंत्रमुग्ध करेल तर 'कल्ला मस्ती' हे गीत ठेका धरायला लावेल. तरुणाईची आवड लक्षात घेत संगीतकार अविनाश- विश्वजीत जोडीने सुरेल संगीत दिलंय. 'प्रेम' या अडीज अक्षरांची किमयाच निराळी आहे. ते प्रत्येक वेळी तुम्हाला नव्याने उलगडते. 'गुरु पौर्णिमा' चित्रपटातून दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी प्रथमच प्रेमकथा हाताळली असून प्रेमाचं एक वेगळं रूप प्रेक्षकांसमोर आणले आहे.
उपेंद्र लिमये, सई ताम्हणकर यांच्यासह हिंदीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा आर्य, सुशांत नायक, राजीव हेडे, विधीता काळे यांनी भूमिका साकारल्यात. गोव्यातल्या नयनरम्य लोकेशन्सवर चित्रित झालेला 'गुरु पौर्णिमा' सप्टेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येईल तत्पूर्वी यातील गीते प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालतील हे निश्चित !
No comments:
Post a Comment